
डॉ अभिषेक राणे संस्थापक लोक आश्रम यांच्या विद्यमाने २३ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या पहिल्या ठाणे स्मार्ट सिटी मॅरेथॉनला ठाणे जिल्ह्यातील धावपटूंनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. विविध आठ गटात रंगणाऱ्या या शर्यतीसाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून दोन हजारहून अधिक धावपटूंनी सहभाग निश्चित केला असल्याची माहिती या शर्यतीचे प्रमुख संयोजक डॉ अभिषेक राणे यांनी दिली.
या संदर्भात डॉ अभिषेक राणे म्हणाले शर्यतीत पुरुष आणि महिला गटाकरता १० किलोमीटर , १८ वर्ष मुले – मुली ७ किलोमीटर, १५ वर्षे मुले – मुली ५ किलोमीटर आणि १२ वर्षे वयोगट मुले – मुलीकरता २ किलोमीटर शर्यत होणार आहे. प्रत्येक शर्यतीतील पहिल्या दहा क्रमांकाच्या धावपटूंना रोख बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेदरम्यान सुमारे एक लाखाहून अधिक रकमेची रोख बक्षिसे देण्यात येतील. त्यात पुरुष आणि महिला गटातील विजेत्या धावपटूला प्रत्येकी दहा हजार रुपये देऊन गौरवण्यात येईल. संपूर्ण ठाणे पूर्व भागातून फिरणाऱ्या या शर्यतीत ठाणे जिल्ह्यातील आघाडीचे धावपटू सहभागी होणार असल्याने वेगळी चुरस ठाणेकरांना पहायला मिळणार आहे.