
आग विझविताना शहीद झालेल्या सागर शिंदे, काळू गाडेकर यांना वाहिली श्रद्धांजली
ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी आग विझवताना शहीद झालेले सागर शिंदे व काळू गाडेकर यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांना शहीद दर्जा देण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वस्त केले.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ ऊ. शानू पठाण, आयुक्त सौरभ राव, शिवसेना गटनेते पवन कदम, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीच्या सभापती मीनल संखे, स्थानिक नगरसेवक संजय वाघुले, सुनेश जोशी, मृणाल पेंडसे, प्रतिभा मढवी, अनिता गौरी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, दीपक झिंजाड, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, मोहन कलाल तसेच गावदेवी मार्केटमधील ओटलेधारक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवघ्या ६० दिवसांत गावदेवी मार्केटचे नूतनीकरण पूर्ण केल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर, आयुक्त सौरभ राव यांच्यासह ठाणे महापालिकेने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. व्यवसाय करणाऱ्यांनीही सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या.
२१ मे २०२६ रोजी शॉर्ट सर्किटमुळे गावदेवी मार्केटला भीषण आग लागली होती. या आगीत सर्व ओटले जळून खाक झाले होते आणि मार्केटचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर महापालिकेने युद्धपातळीवर काम करत मार्केटचे नूतनीकरण केले. नव्या मार्केटमध्ये विद्युतीकरण, सीसीटीव्ही यंत्रणा, फायर अलार्म सिस्टीम, रंगरंगोटी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.