
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांच्या वतीने उपवन तलाव येथे साकारण्यात आलेल्या ५१ फुटी भव्य श्री विठ्ठलमूर्तीसमोर आज भक्तिमय वातावरणात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या सोहळा नगरसेविका सौ. परिषा सरनाईक आणि युवासेना कार्याध्यक्ष श्री. पुर्वेश सरनाईक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी ठाणे शहरातील हजारो वारकरी, विठ्ठलभक्त आणि नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदविला.
‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ आणि ‘रामकृष्ण हरी’च्या अखंड जयघोषाने संपूर्ण उपवन परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. वारकरी परंपरेचा उत्साह, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि भक्तीमय वातावरण यामुळे उपस्थितांना पंढरीच्या वारीचा अनुभव मिळाला.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे बनारसच्या गंगा आरतीच्या धर्तीवर सादर करण्यात आलेली भव्य आरती. या देखण्या आणि अध्यात्मिक सादरीकरणाने उपस्थित भाविकांचे मन प्रसन्न झाले.
आषाढी एकादशी हा केवळ धार्मिक उत्सव नसून श्रद्धा, सेवा आणि समतेचा संदेश देणारा अध्यात्मिक सोहळा आहे. पंढरपूरला जाता न येणाऱ्या वारकरी आणि विठ्ठलभक्तांना ठाण्यातच विठुरायाचे भव्य दर्शन घडावे, या भावनेतून ५१ फुटी श्री विठ्ठलमूर्ती साकारण्यात आली आहे. या माध्यमातून वारकरी परंपरेचा गौरव जपत समाजात भक्ती, संस्कृती आणि एकोप्याचे संस्कार अधिक दृढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो, हीच प्रार्थना, अशा भावना पुर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केल्या.
अल्पावधीतच ही मूर्ती ठाणेकरांच्या श्रद्धा, भक्ती आणि आस्थेचे केंद्र बनली असून भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.