
दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारच्या विरोधात शिवसेनेची निषेध रॅली
ठाणे, प्रतिनिधी – दिल्लीतील जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज ठाण्यात जोरदार निषेध रॅली काढली. या रॅलीत ठाण्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी, पालक यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी हातात तिरंगा, निषेधाचे फलक घेत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या हा एकच आवाज यावेळी घुमला.
पेपरफुटी प्रकरणानंतर राजधानी दिल्लीत कॉक्रोज जनता पार्टी या संघटनेने गेल्या २५ दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिला. मात्र, दिल्ली सरकारी यंत्रणेने सोनम वांगचुक यांना बळजबरीने ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. मात्र आंदोलनकर्ते विद्यार्थी ठाम राहिल्यानंतर २० जुलै रोजी बेछूट लाठीहल्ला केला. केंद्र सरकारच्या भूमिकेच्या विरोधात देशात संतापाचे वातावरण असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी या रॅलीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटिका रेखाताई खोपकर, शहरप्रमुख अनिश गाढवे, ठाणे महानगर संघटक महेश कदम, ओवळा-माजिवडा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे, सुनील पाटील, ठामपा नगरसेवक शहाजी (गणेश) खुस्पे, मा. नगरसेवक मंदार विचारे, समन्वयक संजय तरे, उपजिल्हा संघटिका अड. आकांक्षा राणे, महेश्वरी तरे, मा. नगरसेविका नंदिनी विचारे, शहर संघटिका प्रमिला भांगे, संगीता साळवी, सुनंदा देशपांडे, राजेश्री सुर्वे, नंदा कोथळे, विभाग प्रमुख रमेश शिर्के, तुषार रसाळ, सचिन पाटील, वसंत गवाळे, सचिन चव्हाण, सुभाष म्हसकर, संजय दळवी, अमोल हिंगे, तसेच सर्व विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, उप शहर प्रमुख व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिसांकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध
या आंदोलनात ठाण्यातील विविध भागातील विध्यार्थ्यानी सहभाग घेत सरकारचा निषेध केला. भर पावसात आंदोलकांनी हातात फलक घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. दिल्लीतील आंदोलनावर पोलिसांकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध यावेळी करण्यात आला. या निषेध रॅलीची सुरुवात चिंतामणी चौकपासून करण्यात आली. त्यानंतर पुढे मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ रॅलीची सांगता करण्यात आली.