
स्थानिक लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत दिल्या शुभेच्छा
देशभक्तीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी ठाणे महानगरपालिका शाळांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 23, 102 तसेच माध्यमिक शाळा क्रमांक 1, 15 आणि 23 (इंग्रजी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तिरंगा राखी कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आकर्षक तिरंगा राख्या तयार केल्या.
या कार्यशाळेला स्थानिक नगरसेविका संध्या मोरे आणि एकता भोईर यांची विशेष उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तिरंगा राख्यांची पाहणी करून त्यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत देशभक्तीची भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
तिरंग्याच्या रंगांचा वापर करून विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या आकर्षक राख्या तयार केल्या. स्वतःच्या हाताने तयार केलेल्या या राख्यांमधून विद्यार्थ्यांनी देशाविषयीचा अभिमान आणि प्रेम व्यक्त केले. कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना सर्जनशीलतेसोबतच राष्ट्रीय प्रतीकांविषयी आदर आणि देशभक्तीची जाणीव निर्माण होण्यास मदत झाली.
या उपक्रमासाठी गटप्रमुख निलिमा पाटील उपस्थित होत्या. तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तन्वी वारीक यांच्यासह समितीचे इतर सदस्य देखील उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवत त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि राष्ट्रध्वजाविषयी अभिमानाची भावना जोपासावी, हा संदेश देण्यात येत आहे.