
कोपरी वॉटर फ्रंटचे वास्तव उघड….
स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या कोपरी खाडीलगतच्या “कोपरी वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट” प्रकल्पाचा फज्जा उडाला आहे. अवघ्या अडीच वर्षांतच कोट्यवधींचा प्रकल्प मोडकळीस आला असून निकृष्ट दर्जा व भ्रष्टाचार स्पष्टपणे समोर आला आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता राहुल पिंगळे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट चौकशी व कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन दिले आहे. या प्रकल्पात शौचालय, अॅम्पी थिएटर, उद्यान, वाहनतळ, जेट्टी रस्ता नूतनीकरण, ऐतिहासिक तोफांसाठी चौथरा, दशक्रियेसाठी घाट अशा सुविधा करण्यात आल्या होत्या. मात्र आज या सर्वच सुविधा दुरावस्थेत दिसत असून नागरिकांच्या पैशांची उघड उधळपट्टी झाल्याचे चित्र आहे. अॅम्पी थिएटरला तडे, बाकड्यांची मोडतोड, तोफांचा चौथरा उखडलेला – या दृश्यांनी ठाणेकर संतप्त झाले आहेत. पिंगळे यांनी आरोप केला की, “निकृष्ट कामे, भ्रष्टाचार व ढिलाई यामुळे प्रकल्पाची दुर्दशा झाली आहे. काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून, जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हायलाच हवी.” यापूर्वीही स्मार्ट सिटीतील कामकाजावर गंभीर आरोप झाले होते. केंद्रीय नागरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी चौकशीचे आदेश दिले होते, मात्र ठोस कारवाई न झाल्याने भ्रष्टाचाराला खतपाणी मिळाल्याचे आरोप होत आहेत. ठाणेकरांच्या पैशांचा अपव्यय, महापालिकेची मलिन प्रतिमा आणि प्रकल्पांचा झालेला फज्जा यावर मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.