
ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा मेट्रो ४अ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची चाचणी सोमवारी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही चाचणी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना ठाणे मेट्रो दिरंगाईबाबत महा विकास आघाडीवर खापर फोडले. मेट्रो ४ आणि ४अ मिळून सुमारे ३५ किमी लांबीचा हा मार्ग असेल. यात एकूण ३२ स्थानके असणार असून, पूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर दररोज सुमारे १३ लाख ४७ हजार प्रवासी या मार्गावरून प्रवास करतील. या प्रकल्पासाठी जवळपास १६ हजार कोटींचा खर्च करण्यात येत असून, मोघरपाडा येथे ४५ हेक्टर जागेत डेपो उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी मेट्रो ४, ४अ, १० आणि ११ या सर्व मार्गिकांचे डेपो एकत्रितपणे कार्यरत होणार आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले. या मार्गिकेवरील मेट्रो आठ डब्यांची असेल. पूर्व व पश्चिम उपनगरे, ठाणे आणि मुंबईला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून प्रवासाचा वेळ ५० ते ७५ टक्क्यांनी कमी होणार आहे. रस्त्यावरची वाहतूक नियमित होण्यास देखील मदत होईल. पुढील वर्षापर्यंत जास्तीत जास्त टप्पे पूर्ण होतील, काही काम मात्र २०२७ पर्यंत सुरू राहील,” असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. मोघरपाडा डेपोकरिता जमीन उपलब्ध करून देण्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांचे फडणवीस यांनी विशेष कौतुक केले. आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याचाही त्यांनी उल्लेख केला.
महाविकास आघाडीवर खापर..
ठाणे मेट्रो प्रकल्पाचे २०१९ पर्यंत प्रकल्पाचे काम वेगाने सुरू होते. मात्र त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी या प्रकल्पाला ब्रेक लावला. त्यानंतर २०२२ ला आमचे सरकार सत्तेवर येताच या प्रकल्पाचे काम पुन्हा वेगाने सुरू झाले. महाविकास आघाडीने त्या प्रकल्पाला ब्रेक लावला नसता तर आज या संपूर्ण प्रकल्पाच्या मार्गिकेचे आम्ही लोकपर्ण केले असते, असा आरोप करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर खापर फोडले. मला या मेट्रोकरिता आंदोलन करावे लागले होते. पुणे-पिंपरी चिंचवड येथे मेट्रो जाहीर झाली, पण ठाण्याला नाकारली गेली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर ठाण्याला मेट्रो मिळाली. महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पाला ब्रेक लावल्याने ठाणेकरांना मेट्रो उशिरा मिळाली आणि प्रकल्पाचा खर्चही वाढला. मी मुख्यमंत्री झाल्यावर या कामाला वेग दिला आणि आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचे ट्रायल रन सुरू झाले, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.