
मुंबई विद्यापीठात सरला साहित्य संसद, ओडिशा आणि पाली विभागाची एकदिवसीय साहित्य सभा….
मुंबई विद्यापीठाचा पाली विभाग आणि सरला साहित्य संसद (मुंबई चॅप्टर) यांनी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते.
“दगडांची कुजबुज: बौद्ध धारिणी आणि ओडिशान काव्य संस्कृती” या विषयावर एकदिवसीय साहित्य संमेलन २३ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई विद्यापीठाच्या पाली विभागातील नवीन भाषा भवनात पार पडले. या संमेलनाचे उद्घाटन व्यास सन्मान आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या हिंदी लेखिका सुश्री सूर्यबाला यांनी केले. सरला साहित्य संसदचे संस्थापक व अध्यक्ष, प्रख्यात ओडिया लेखक डॉ. प्रवाकर स्वैन यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. सरला साहित्य संसदच्या मुंबई चॅप्टरचे संयोजक डॉ. राजेश करंकाळ यांनी आपल्या स्वागतपर भाषणात पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि विषयावर माहिती दिली.
पाली विभागाच्या समन्वयक प्रा. डॉ. योजना भगत यांनी विषयाची ओळख करून दिली आणि कलिंग बौद्ध वारशाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व, तसेच धारिणी आणि ओडिशान कवितांचा शैक्षणिक परंपरेत असणारा परस्पर संवाद या संदर्भात भाष्य केले. प्रमुख पाहुण्या सुश्री सूर्या बाला यांनी ओडिशान काव्य परंपरेवर भाषण केले. त्यांनी पुढे सांगितले की, सरला दास हे ओडिया साहित्याचे जनक आहेत. ज्यांनी भारतातील प्रादेशिक भाषेत पहिले संपूर्ण महाभारत लिहिले. सरला दास यांचे महाभारत हे १५ व्या शतकातील ओडिशाचे सामाजिक-सांस्कृतिक चित्रण आहे. त्याकाळी त्यांच्या या लेखनासाठी विरोधाला सामोरे जावे लागले. राजभवनातील जनसंपर्क अधिकारी असलेले सन्माननीय अतिथी श्री. उमेश काशीकर यांनी ओडिशा आणि महाराष्ट्रातील साहित्यिक आणि सांस्कृतिक संबंधांवर भाषण दिले. डॉ. बिपिन मिश्रा यांनी ओडिशा आणि मराठी साहित्यातील राष्ट्रीय एकात्मता आणि बंधांसाठी अशा संमेलनांचे महत्त्व सांगितले. पाली विभागाचे जयेश जवादे, आणि अभिज्ञा शिर्के यांनीही दृकश्राव्य सादरीकरणांचा वापर करून ओडिशान कवितेवर बौद्ध धारिणींचा प्रभाव यावर भाषण केले. या प्रसंगी, डॉ. प्रवाकर स्वैन लिखित आणि प्रा. सत्यनारायण पांडा लिखित हिंदीत अनुवादित ‘आखरी मुस्कान’ या ओडिया लघुकथा संग्रहाचे प्रकाशन सुश्री सूर्या बाला यांच्या हस्ते करण्यात आले..