
चाळ दुर्घटनेत मुलगा गमावलेल्या कुटुंबाला १० लाखांची मदत ; वडिलांच्या निधनानंतर युवतीच्या उच्च शिक्षणासाठीही मदत
ठाण्यातील दोन वेगवेगळ्या संकटग्रस्त कुटुंबांना शिवसेनेने दिलेल्या मदतीमुळे त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे. घोडबंदर रोडवरील मानपाडा परिसरातील आझाद नगर येथे झालेल्या चाळ दुर्घटनेत मुलगा गमावलेल्या जैस्वार कुटुंबाला १० लाखांची आर्थिक मदत देण्यात आली, तर वडिलांच्या निधनानंतर शिक्षणाची भीती निर्माण झालेल्या अभियांत्रिकीची विद्यार्थिनी अनुराधा उदमले हिलाही शिक्षणासाठी भक्कम आधार मिळाला आहे.
ब्रम्हांड, आझाद नगरमधील सुमारे ३० वर्षे जुन्या एकमजली चाळीतील दोन घरे १० जुलै रोजी अचानक कोसळली होती. या भीषण दुर्घटनेत बहादूर जैस्वार यांचा १२ वर्षीय मुलगा जय जैस्वार याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर कुटुंबातील इतर सदस्य जखमी झाले. क्षणार्धात संसार उद्ध्वस्त झालेल्या या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या दुर्घटनेची माहिती मिळताच शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक तथा माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत कुटुंबीयांची भेट घेतली आणि मदतीचे आश्वासन दिले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जैस्वार कुटुंबाला १० लाखांची आर्थिक मदत जाहीर केली. ही मदत बुधवारी मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आली.
.दरम्यान, दुसऱ्या एका हृदयस्पर्शी प्रकरणात डी. वाय. पाटील महाविद्यालयात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्सच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणारी अनुराधा उदमले हिच्या आयुष्यालाही मोठा धक्का बसला होता. काही महिन्यांपूर्वी तिचे वडील बापू उदमले यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने कुटुंब आर्थिक संकटात सापडले. त्यामुळे अनुराधाच्या उच्च शिक्षणावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ही बाब समजल्यानंतर मीनाक्षी शिंदे यांनी उदमले कुटुंबीयांची भेट घेऊन अनुराधाचे शिक्षण खंडित होऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी हा विषय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडला. त्यानुसार अनुराधाच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सुमारे १० लाख रुपयांच्या शुल्काचा प्रश्न मार्गी लावण्यात आला. त्यामुळे तिच्या अभियंता होण्याच्या स्वप्नाला नवी उमेद मिळाली.
दोन्ही घटनेत सर्वस्व गमावलेल्या कुटुंबाना आर्थिक आधार देत शिवसेनेने सामाजिक बांधिलकी जपल्याने समाजकारणाचा अनोखा प्रत्यय आला आहे.