
खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पोयनार गावात पांडुरंग बाळू तटकरे यांच्या कुटुंबातील गौरी पूजनाची परंपरा यंदा १७८व्या वर्षात पदार्पण करत आहे. तब्बल दहा पिढ्यांपासून या गौरीचे आगमन आणि पूजन पारंपरिक पद्धतीने केले जात आहे. यंदाही तटकरे कुटुंबातील चार पिढ्यांतील महिला एकत्र येत गौरीचे विधिवत पूजन करताना दिसल्या.
विशेष म्हणजे, गौरीच्या पूजेसाठी आवश्यक असलेल्या चिरड्यापासून ते गौरीच्या मूर्तीच्या निर्मितीपर्यंतचा संपूर्ण प्रवास आजही पारंपरिक पद्धतीने जपला जातो. त्यामुळे तटकरे कुटुंबातील ही गौरी केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय न राहता, दहा पिढ्यांनी जतन केलेला समृद्ध सांस्कृतिक आणि कौटुंबिक वारसा ठरली आहे.
गौरीच्या आगमनापासून पूजनापर्यंतच्या प्रत्येक विधीमध्ये जुन्या परंपरांचे काटेकोरपणे पालन केले जाते. घरातील ज्येष्ठ महिलांकडून पुढील पिढीतील महिलांना या परंपरेचे ज्ञान आणि संस्कार दिले जात आहेत. त्यामुळे चार पिढ्यांतील महिलांचा एकत्रित सहभाग हा परंपरा पुढील पिढीकडे हस्तांतरित होत असल्याचे जिवंत चित्र ठरला.
काळ बदलला, पिढ्या बदलल्या; मात्र १७८ वर्षांपासून सुरू असलेली गौरी पूजनाची परंपरा, त्यामागची श्रद्धा आणि पारंपरिक पद्धती तटकरे कुटुंबाने आजही तितक्याच भक्तिभावाने जपली आहे. आधुनिकतेच्या काळातही या कुटुंबाने आपल्या पूर्वजांकडून आलेली परंपरा जिवंत ठेवली असून, गौरीच्या माध्यमातून पिढ्यान्पिढ्यांचा सांस्कृतिक धागा आजही घट्ट जोडलेला आहे.