
सावनी रवींद्रचा पहिलाच वारी अनुभव, गायनसेवेचं शुटिंगही पार पडलं, वारकरी मंत्रमुग्ध….
वारी या शब्दातच खूप पावित्र्यता आहे. पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीची आस बाळगून प्रत्येक वारकरी आपल्या परीने त्या विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो. विठुरायाचं बोलावणं आल्याशिवाय ही भेट घडत नाही असं बोललं जात. आणि हो हे खरंय. जिच बालपणचं चिंचवड येथे झालं त्या गायिकेला या वारीचा अनुभव आता घेता आला. हा अनुभव आपल्यासह शेअर केला आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रविंद्रने. सावनीने आजवर अनेक गाण्यांमधून रसिकांच्या मनावर राज्य केलं. आता सावनी विठुरायाच्या वारीत सहभागी झाली असून तिने यावेळी गायनसेवेने साऱ्या वारकऱ्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. नाकात नथ, सुंदर साडी, केसात गजरा असा मराठमोळा लूक करत सावनीने यंदाच्या वारीत सफर केले. पहिल्यांदाच अनुभवलेल्या या वारीचा अनुभव तिने यावेळी सांगितला. आयुष्यात पहिल्यांदा वारीचा अनुभव फलटण येथे घेतला. अत्यंत विलक्षण असा हा अनुभव होता. आजपर्यंत लहानपणापासून अनेक अभंगरचना, संतरचना मी सादर केल्या आहेत, त्यामध्ये वारीच वर्णन ऐकलं आहे. माझं बालपण पुण्यातील चिंचवड येथे अत्यंत पवित्र ठिकाणी गेलं, जिथे देहू आणि आळंदी सारखी पवित्र तीर्थक्षेत्र आहेत. त्यामुळे लहानपणापासून वारी दुरून अनुभवली होती, चिंचवडमधून वारीच प्रस्थान होतं त्यामुळे ते अनुभवलं होतं पण कधी वारकरी म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली नव्हती. दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम असतात, दौरे असतात त्यामुळे असा योग जुळून आला नाही. माझी अशी श्रद्धा आहे की, तुमची इच्छा असण्यापेक्षा ज्यावेळी पांडुरंगाचं बोलावणं येतं तेव्हा ती सेवा घडते. असं यंदा माझ्याबरोबर घडलं. धर्म, पंत, जात-भेद, भाषा या कशाचंही बंधन नसता वारकरी म्हणून त्याचा वारीमध्ये समावेश असतो. प्रत्येकाच्या मुखावर हरिनाम असतं. हा अनुभव मी माझ्या मनात आयुष्यभर साठवेन. पहिला अनुभव हा नेहमीच संस्मरणीय असतो तसा तो ठरला. यामध्ये मी खेळ मांडियेला या संत तुकारामांच्या अभंगाचं शुटिंग मला वारीमध्ये करता आलं. मला या शूटिंग दरम्यान कोणतीही अडचण आली नाही. प्रत्येक वारकऱ्याने मला त्यांच्यामधील एक बनवून घेतलं. त्यामुळे हे शूटिंग मी अत्यंत आनंदात पार पाडू शकले याचा खूप आनंद आहे.